टीम कृषी योजना / krushi yojana
ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबात या वर्षात कन्येचा जन्म झाला आहे.अशा कुटुंबियांना सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 1 जुलै या दिवशी 10 विविध प्रजातींच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘कन्या वन समृध्दी योजनेचा’ लाभ घ्यावा असे आवाहन वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकरी कुटुंबात ज्या दाम्पत्यास कन्येचा जन्म झाला आहे अशा कुटुंबियांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून १० रोपे गावाच्या ग्रामपंचायत च्या माध्यमातून विनामूल्य दिले जाणार आहेत. या 10 रोपांमध्ये 5 रोपे सागाची म्हणजेच सागवाणाची, 2 रोपे आंब्याची , 1 रोप फणसाचे, 1 जांभूळ व 1 रोप चिंचेचे दिले जाणार आहे. शेतकऱ्याने लागवड करून मोठे झाल्यावर या झाडांपासून जे उत्पन्न मिळेल यातून मुलीच्या शिक्षणास हातभार लावण्याचा सरकारची योजना आहे. कौशल्य विकास,मुलीचे उच्च शिक्षण व रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. या योजनेचा लाभ तीच कुटुंब घेऊ शकतात ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्मल्या आहेत व त्याच बरोबर १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. गेल्या २ वर्षांत जवळपास ५६ हजार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजने द्वारे राज्यात ५५९००० इतके वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊन दि. ३० जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत १ जुलै या एकाच दिवशी शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज त्वरित भरुन ग्रामपंचायतीकडे द्यावा व सामाजिक वनीकरण विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश काय आहे.?
वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता आदींबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरु करण्यात आली आहे.