लाल कांदा केला अन उगवला पांढरा कांदा ; शेतकऱ्यांची फसवणूक (Red onion seeds planted but white onion sprouted; Fraud of farmers)
टीम कृषी योजना / Krushi Yojana
राहुरी तालुक्या मध्ये एका शेतकऱ्याने आपल्या शेतात लाल कांदा म्हणून बियाणाची पेरणी केली होती. परंतु शेतात लाल कांद्या ऐवजी पांढरा कांदा उगवला. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक झाली असून पैश्या बरोबर श्रम देखील वाया गेले आहेत.
काबाडकष्ट करून शेतात कांदा पिकवण्यासाठी लाल कांदा लावला परंतु पांढरा कांदा उगवल्याने कांदा बियाण्यात फसवणूक झालेल्या कंपनीचा परवाना रद्द करून शेतकऱ्यास तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा सर्व शेतकऱ्याना सोबत घेऊन राहुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय क्रांती सेनेने दिला आहे.अखिल भारतीय क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांनी दिला आहे. या बाबत मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी नितीन खांदे, रोहित शेटे, केंदळ बुद्रूक येथील शामसुंदर तारडे या शेतकऱ्यांच्या शेतात लाल कांद्या ऐवजी पांढरा कांदा पिकल्याने शेतकऱ्याची बियाणात फसवणूक झाल्याच्या लेखी तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालया राहुरी यांच्याकडे सादर केल्या होत्या. फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त अहवालात लाल कांद्याऐवजी पांढरा कांदा पिकला असा अहवाल येणे आवश्यक असताना, कांदा बियाणांची उगवण न झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आल्याने संबंधित कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क करून व पत्र व्यवहार करून देखील या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याच्या कडून न्याय मिळाला नाही.